Monday, January 14, 2019

सरस्वती भुवन




औरंगाबाद ची सरस्वती भुवन शिक्षण संस्थे ची Management अपेक्षे प्रमाणे बदलली , त्या वर श्रीयुत विश्वम्भर चौधरी ची प्रतिक्रिया वाचली. (खाली त्याचा फोटो टाकत आहे) त्यांची अशी प्रतिक्रिया येणे अपेक्षितच  होते.... त्यात नवीन काहीच नाही.

त्यांना माझे काही प्रश्न ? उत्तरे अपेक्षित नाहीत...कारण त्या विचार सरणीत वाद- प्रतिवाद असे काही नसते , फक्त  "मी म्हणतॊ तीच पूर्व दिशा असते "

पहिला मुद्दा चौधरी म्हणतात हि संस्था गोविंद भाई किंवा दिनकर राव बोरीकरांचा वारसा सांगणारी आहे  , मुद्दा अगदी शंभर टक्के मान्य...आहे खरेच त्यांचा वारसा. .पण त्यांच्या पूर्वी  भाऊ साहेब वैशंपायन, वैष्णव आणि पारगावकर अशी अनेक मंडळी होतीच ना? शंभर वर्षाचा इतिहास सांगणारी संस्था आहे.

- पण माझा प्रश्न असा आहे  वारसा म्हणजे नक्की काय?   वारसा म्हणजे पूर्वसुरींकडून मिळालेल्या गोष्टी किंवा संस्कार, मग त्या मूर्त असतील अथवा अमूर्त ... हा मिळालेला वारसा जपायचा , त्यात आपल्या परीने भर घालायाची  आणि तो पुढच्या पिढीच्या हाती सोपवावा, ही झाली रीत. वर उल्लेखलेल्या जुन्या मंडळींनी हे इमाने इतबारे केले. आता प्रश्न असा आहे गोविंद भाई चे नाव घेऊन वावरणाऱ्या पिढीने खरेच जपला आहे का वारसा ? सरस्वती भुवन शिक्षण संथेतला पराभव , हा समाजवादी विचारसरणी च्या नाकर्ते पणाचा पराभव नाही का ?

अटलजी म्हणाले होते तसे " पराजय मे मंथन होना जरुरी है " , समाजवाद्यांना हे कधीच जमले नाही आणि मग शकले होत गेली ... समाजवादाची शकले होत गेली ही वस्तुस्थिती नाही का  ?
संघ का जिंकतो पेक्षा समाजवाद का हरतो या वर विचार कधी करणार ?समाजवादी  विचार पुढच्या पिढीत रुजवू शकले नाही आणि एकूणच पुढची पिढी त्या विचारांची घडली नाही हे समाजवादाचे ढळढळीत अपयश नाही का ?

तुमच्या कडून अपेक्षा नाही, पण याचे उत्तर कै एस एम जोशी त्यांच्या आत्मचरित्रात देऊन गेलेत ..समाजवादी नेत्या मध्ये किंवा एकूणच मंडळी मध्ये , वादविवादा मध्ये मुद्दा समजावून सांगण्या पेक्षा मुद्द्याला बगल देऊन फटकारून वागण्याची एकूण सवय पूर्वापार चालत आली आहे. (मी एस एम पान न. ३१९) सगळा जोर पब्लिसिटी वर ....हा पक्षाचा मोठा दोष.. (पान न. ३२० )

दुसरा मुद्दा , गोविंद भाई चे विचार….

एक उदाहरण म्हणून विचारतो ...
कै गोविंद भाई किंवा कै अनंतराव चे अपत्य " मराठवाडा दैनिक " ….त्याचे अक्षरशः दिवाळे काढून , ती जागा बिल्डर च्या घशात घालून , तिथे टोलेजंग इमारत उभा राहत असताना ... कुठे गेले होते कै गोविंद भाई किंवा कै अनंतरावा चे विचार ? मराठवाडा  दैनिकाची शोकांतिका पाहून कै अनंतरावाच्या आत्म्याला वेदना होत नसतील का  ? माफ करा तुमची इहवादी विचारसरणी ...आत्मा वगैरे न मानणारे  तुम्ही ....पण जिथे एक दैनिक पुढची पिढी जपू शकत नाही तिथे संस्था किंवा इतर गोष्टी बद्दल बोलणे हास्यस्पद नाही का ? वारसा किंवा विचारा बद्दल बोलायचा खरेच अधिकार आहे का ? वारसा , विचार असले शब्द तोंडावर फेकणे खूप सोपे असतात

संघाने बहुतेक ठिकाणी " तरुण भारत " जिवंत ठेवला , कै परुळेकरांच्या नंतर पुण्यात सकाळ अजूनही आहे ...याची काय कारणे असतील  ?

- "समाजवाद्यांचा तो वारसा आणि संघाची ती संस्कृती " या मानसिकतेतून बाहेर येणे गरजेचे नाही का ?

तिसरा मुद्दा , त्याचे आव्हान स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना केलेले ..संस्था इतरांच्या घशात जाऊ देऊ नका ...विचार करा वगैरे वगैरे ...
एक लक्षात घ्यायला हवे  सांजवाद्यांनी विचार वगैरे केले असते तर पक्षाची इतकी शकले झालीच नसती , एखादया विचारसरणीतील फोल पण लक्षात आले कि कुठलीही सामान्य विचार करणारी व्यक्ती ती विचार सरणी फेकून नवीन आत्मसात करते ..प्रत्येकाची बुद्धी चांगले वाईट विचार करण्याला समर्थ असते. नेमके हेच पुढच्या पिढीत झाले, तुमच्या साद घालण्याचा किंवा आव्हानाचा कितपत उपयोग होईल देव जाणे ?
कारण इंग्लिश मध्ये म्हणतात तसे Change is only the constant thing !

स भू संस्थे ची निवडणूक ही लोकशाही पद्धतीने झाली , त्यात श्री राम भोगले , श्री अरुण मेढेकर आणि इत्तर अनेक मंडळी निवडून आली , ही दोन नावे घेण्याचे कारण मी व्यक्तिशः दोघांनाही ओळखतो , त्यांच्या कर्तृत्वा वर अथवा हेतू वर कोणी शंका घेऊ शकतच नाही...इतरही मंडळी त्याच योग्यतेची असतील यात वाद होऊ शकत नाही…. आणि मुख्य सगळे माजी वियार्थी आहेत...

ही सगळी मंडळी काही संघ विचारांची नक्कीच नाहीत  , श्री चौधरी च्या लेखात त्यांनी नेहमी प्रमाणे संघाला ओढले म्हणून संघाचे दाखले द्यावे लागलेत, तशी कुठलीही विचारसरणी वाईट नसते , वाईट असते ती आत्मकेंद्रित वृत्ती ...माझेच खरे म्हणण्याचा अट्टाहास ...

 हरलेल्या मंडळींचे दुःख आपण हरलो हे असायला हवे ...पण दुर्दैवाने खरे दुःख दुसरी विचारसरणी जिंकली हे आहे ...  


बिपीन कुलकर्णी