Wednesday, May 16, 2018

अनावृत्त पत्र.... बिग बॉस ...

#colorsmarathi #biggbossmarathi

अनावृत्त पत्र.... बिग बॉस ...



श्रीयुत बिग बॉस,



कलर्स मराठी वर आपल्या  कार्यक्रमाची सुरुवात वाजत गाजत झाली, हिंदी बिग बॉस पाहिलेल्या प्रेक्षकांना मराठी कार्यक्रमाची उत्सुकता असणे साहजिक होते.... त्यात गेल्या काही महिन्यात कलर्स मराठी  ने कात टाकून काही चांगले कार्यक्रम दिले ... "सूर नवा ध्यास नवा" सारख्या कार्यक्रमांनी चॅनेल ला  एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते  .... त्या मुळे बिग बॉस नक्कीच प्रेक्षणीय असेल असे वाटल्या मुळे  पाहण्याची उत्सुकता होती  ...

बिग बॉस म्हणजे काही गोष्टी अपेक्षित असतात ...जसे की होणारी भांडणे, वादावादी  किंवा एक मेकावर होणारी कुरघोडी ...हे सगळे या कार्यक्रमाचा अविभाज्य भाग आहेत आणि त्यात गैर असे काही नाही …

ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत ... पण हे दाखवीत असताना  राजेश आणि रेशम च्या चाळ्यांना जे  तुम्ही खत पाणी घालून प्रेक्षकांच्या माथी मारत आहात  ते अक्षम्य आहे ... TRP च्या जुगारा  करीता कुठल्या थराला नेणार आहात हे सगळे?

या TRP च्या नादात तुम्ही एक गोष्ट विसरता आहात ... जो हिंदी आणि मराठी चॅनेल मधला मूलभूत  फरक आहे ....

मराठी कार्यक्रम हा घरोघरी तीन पिढ्या एकत्र बसून बघत असतात...निदान महाराष्ट्रात तरी या बाबतीत  हिंदी चॅनेल करंटे ठरतात  ....

आभाळमाया , गंगाधर टिपरे , सा रे ग म , सूर नवा ही काही उदाहरणे .... आई ,वडील, मुलगा , सून आणि नातवंडांनी एकत्र कार्यक्रम पाहण्याची घरा घरात परंपरा   आहे ....

प्रेक्षकाना गृहीत धरले तर काय होते हे तुम्हाला कोणी सांगायची गरज नाही ....  उदाहरण जर द्यायचे झाले  तर  " चला हवा येऊ द्या "

राजेश आणि रेशम चे जे चाळे "रोमान्स " या गोंडस नावा खाली  प्रेक्षकांच्या माथी मारत आहात त्याला शुद्ध मराठी मध्ये "व्यभिचार " अथवा "अनैतिक xxx " म्हणतात ...

एकवेळ आपण म्हणू  त्या दोघांनी लाज सोडली  ....

जी बाई स्वतः २० -२२ वर्षाच्या दोन मुलींची आई आहे याचे भान न ठेवता पर पुरुषा बरोबर  चाळे करते  ...किंवा जो पुरुष स्वतः चा संसार विसरून इथे नको ते धंदे करतो   ...आणि  बाकी घरातील कलाकार (काही अपवाद सोडून ) यांच्या अनैतिक चाळ्यांना "प्रेम" किंवा "relationship" हे शब्द वापरून सहानभूती दाखवितात .... त्यांच्या अकलेची कीव करावी वाटते ?

ह्या लोकांची अक्का एक वेळ समजू शकतो पण तुम्ही निर्लज्ज पणे नॅशनल टेलिव्हिजन वर दाखविता हे नक्कीच लाजिरवाणे आहे ...

राजेश आणि रेशम नी कसे वागावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो तसेच ते चूक का बरोबर  हे पण मी नाही ठरवू शकत ,मला तो अधिकारही नाही .... पण तुम्ही जे रोज रोज दाखवीत  प्रेक्षकांची सहनशक्ती बघत आहात ते माझ्या आकलन शक्ती च्या पलीकडे आहे .... तुम्ही तर बोलून चालून बिग बॉस ना ... प्रेक्षक काय स्वीकारतील हे कळू नाही का ?

राजेश रेशम ची थेरे पाहताना घरातील तीन पिढ्यांची काय परिस्थिती होत असेल याचे भान आपणास नसावे का ? आपणही प्रेक्षकांना गृहीत धरीत आहात का ? राजेश ला कार्यक्रमात परत आणले या वरून प्रेक्षकांना नक्कीच तुमच्या हेतू बद्दल शंका येत आहे ...



असो लोकांकडे कार्यक्रम न बघण्याचा पर्याय नक्कीच उपलब्ध आहे ...

TRP च्या खेळात तुम्ही रसा तळाला जाऊ नये एवढेच पोट तिडकीने सांगावे वाटले म्हणून हा पत्र प्रपंच ...



बिपीन कुलकर्णी