Monday, April 16, 2018

परत एकदा विक्रम वेताळ




परत एकदा विक्रम वेताळ                                                                                     16th April 2018

झाडावर लोंबकाळत असलेले प्रेत राजा विक्रमाने उचलले आणि  पाठीवर घेतले आणि तो पुन्हां स्मशानाकडे जाऊ लागला. प्रेतात बसलेला वेताळ त्याला म्हणाला  “विक्रमा आज गोष्ट नाही ऐकणार का ? आज माझ्या जवळ तुझ्या आधीच्या पिढीतील म्हणजेच आजच्या भाषेतील एका सिनिअर सिटीझन ची गोष्ट आहे ...ऐकणार का "

विक्रमाने विचारले " वेताळा मला का सांगावीशी वाटते तुला हि गोष्ट ?"

विक्रमा कारण  नेहमीचेच मला असलेले काही अनुत्तरित प्रश्न....

विक्रमाचे कुतुहुल चाळवले, त्याने वेताळाला गोष्ट सांगायचा आग्रह केला. वेताळाने अट घातली की जर का  तु बोललास तर मी परत झाडाला लटकायला मोकळा , बोल कबूल ? विक्रमाने अट कबूल करताच वेताळ सांगु लागला;

एका आटपाट नगरातील गोष्ट , हे आटपाट नगर म्हणजे मराठवाड्यातील एक  गाव ... आटपाट नगर म्हणजे ब्राम्हण आला आणि ओघाने गरीब आलाच...

गोष्टीचा नायक परिस्थितीने गरीब होता ... ऊन पावसाच्या खेळा सारखे परिस्थितीत बदल होऊन गरिबी जाऊन आज सुखवस्तू आहे ... .

आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले ... नेमकी कुठून सुरु करू कथा ?

तुझ्या लाडक्या लेखकाच्या वाक्याने सुरू करतो…. व पु म्हणतात तसे "स्वप्न आणि ध्येय यांचा फार जवळचा संबंध आहे......स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय आणि ध्येय पूर्ण करण्याचे स्वप्न दोन्ही महत्त्वाचे आहे"  एकदा का  हे समजले कि मग मार्ग सुकर होतो , या कथेतील नायकाला कदाचित हे कळाले होते ...  

वयाच्या पंचविशीत इतरां प्रमाणे M.Sc  झाला ...

वयाच्या ४५ मध्ये म्हणजे जेंव्हा इतर लोकांचा संसार मध्यावर आलेला असतो तेंव्हा यांनी P.hd केली

त्याहून पुढे जाऊन निवृत्ती पूर्वी म्हणजे वयाच्या ५६-५८ मध्ये LLB ची डिग्री घेतली ...

वयाच्या साठी नंतर लेखन सुरु केले ..कथा , कादंबऱ्या लिहिल्या ...

वयाच्या ६२ व्या वर्षी शास्त्रोक्त पद्धतीने शेती केली ...

हे सगळे पाहिल्या नंतर स्वप्न आणि ध्येय यांचा किती जवळचा संबंध आहे याची प्रचिती येते ...

हि सगळी स्वप्ने सहज साध्य झाली असावीत का ? नक्कीच नाही ...कारण नियती आयुष्या मध्ये  ECG च्या ग्राफ प्रमाणे चढ आणि उतार घालत असते, चढा वर थकायचे नसते आणि उतारावर धावायचे नसते ... हे ज्याला समजले तो जिकंत असतो ...

लहान पण हलाखीत गेले, वडिलांच्या नोकरी मध्ये शिकत असताना चैन करणे परवडणारे नव्हते , पायी वण वण करत शिक्षण घेतले , वडिलांचे शर्ट अल्टर करून घातले .... मुलांनी शिकून मोठे व्हावे हे आईचे स्वप्न पूर्ण करण्या करिता धडपड चालू होती  ...

नोकरी ची वण वण करीत बरीच गावे फिरत पश्चिम महाराष्ट्रात नावाजलेल्या कॉलेज मध्ये प्राध्यापकाची  ३५ वर्षे नोकरी केली... हि चाकोरी बद्ध नोकरी नक्कीच नव्हती ...

दोनाचे चार झाले  होते ... संसारात मुले आली होती... थोडे  स्थिर स्थावर होई पर्यंत  आई  ने जगाचा निरोप घेतला होता ...आई साक्षात दैवत ...जिने याला मोठे करण्याचे स्वप्न पहिले होते ... तेच  मातृ छत्र लवकर हरपले... मन सैर भैर झाले ... जगावरचा आणि ईश्वर या संकल्पने वरचाच  विश्वास उडाला ...नवरा आणि बायको संसार रथाची दोन चाके , यांच्या बाबतीत या सगळ्या परिस्थितीत बायकोने संसार पूर्ण सांभाळला ... आयुष्याच्या चढावर सगळे निभावून नेले ...

या अशा सैरभैर परिस्थितीत असताना बायकोने तर साथ दिलीच पण  नियतीने कॉलेज च्या नोकरी मध्ये Promotion मिळवून दिले .... संपूर्ण कॉलेज मध्ये सर्वात लहान वयात Head of the Department झाले ...
विद्यार्थ्यांची गैरशिस्त खपवून न घेणे , विद्यार्थ्या मध्ये आदरयुक्त दरारा निर्माण केला  , स्वतः चे राहणीमान असो किंवा इतर सहकाऱ्यांशी वागणे असो .... या सर्व गोष्टींनी प्राध्यापक कसा असावा हे कॉलेज ला दाखवून दिले ? पुढे जाऊन नकळत अनेक जणां करिता आजच्या भाषेत रोल मॉडेल झाले ...

कॉलेज मधील "सर" किंवा घरातील " बाबा " मध्ये काही फरक होता का ?

गैर शिस्त खपवून न घेणे  किंवा आदर युक्त दरारा  हा एकदा रक्तात आले कि मग घर , नोकरीचे ठिकाण किंवा अजून कुठलेही ठिकाण त्यातून सुटणे शक्यच नाही ...
त्या मुळे मुलांचे लहान पण तसे शिस्तीत गेले ...त्या काळात स्पर्श न करिता प्रेम दाखवले जात असे.... मुलां बद्दल प्रेम दाखविण्या करिता Hug करायची गरज पडली नाही किंवा येता जाता कौतुकाचे शब्द वापरावे लागले नाहीत  .... धाक असो किंवा प्रेम नजरेतून दाखविले जात असे आणि भावना मुलां पर्यंत सहज पोहोचत असत ... मुले आई मार्फत हवे नको ते सांगत असत ...

हे झाले घर आणि नोकरी पण सार्वजनिक जीवनात कसे असावेत ?

स्वभावाला औषध नसते असे म्हणतात ... त्या प्रमाणे खोटे बुरखे वापरून यांना समाजात कधीच वावरता आले नाही ... स्वतः च्या principle करता कधी तडजोड केली नाही तसेच अन्याय सहन केला नाही ...अन्यायाला वाचा फोडण्या करिता कोर्ट कचेऱ्या , पोलीस स्टेशन किंवा ग्राहक मंच च्या पायऱ्या चढण्या करिता कधी मागे पुढे पाहिले नाही ... पदर मोड करताना विचार केला नाही ...

आत एक आणि बाहेर एक असे वागणे स्वभावात  नाही ...
ज्याचे माप त्याच्या पदरात घातलेच पाहिजे  हे साधे सरळ तत्वज्ञान ...
राग आल्यावर १० अंक मोजावेत असे म्हणतात .... पण या असल्या गोष्टी फक्त पुस्तकात असा यांचा ठाम विश्वास...
प्रत्येक गोष्टीचा तार्किकदृष्ट्या विचार करण्याचा स्वभाव ...

एवढे बोलून वेताळ थांबला , विक्रमा कडे पहिले आणि विचारले " विक्रमा मला काही प्रश्न पडले आहेत , त्याची उत्तरे तू देऊ शकतोस का?

मनुष्याचा खरा स्वभाव बाहेर च्या लोकांना कळतो का? या कथेचा नायक आयुष्यात यशस्वी असेल का ? अपयश आणि यशात नियती चा हात कितपत असतो ...

आणि वेताळ विक्रमा कडे उत्तराच्या अपेक्षेने पाहू लागला , कारण त्याला खात्री होती विक्रमा कडे या सगळ्या प्रश्नाची उत्तरे असणार ...

विक्रमा ने काही क्षण विचार केला आणि बोलायला सुरुवात केली .....

वेताळा मनुष्य स्वभाव एक दुसऱ्या कडे एका ठराविक चष्म्यातून पाहत असतो , ज्याला शिक्के मारणे म्हणतात .... पण चष्मा काढून पाहायचा प्रयत्न केला तर खऱ्या स्वभावाची ओळख होऊ शकते ... रागीट माणसे प्रचंड हळवी असतात ... ते राग लपवू शकत नाहीत पण हळवे पण चारचौघात जपत असतात , त्या मुळे हे हळवे पण सामान्य लोकांनां दिसत नसते ....

असे लोक प्रचंड विचार करीत असतात ....मनात विचारांची साखळी चालू असते आणि प्रत्येक होणाऱ्या गोष्टीचे मनात analysis चालू असते....

मुख्य म्हणजे यांचा स्वभाव फणसा सारखा असतो .... पोटात शिरल्या शिवाय गोड़ गर्यांची चव घेता येत नसते ...
त्या मुळे लोक मारत असलेल्या शिक्क्या बद्दल हे लोक विचार करीत नाहीत ... पण जवळच्या माणसाने कधी गैरसमज करून घेतला तर मात्र प्रचंड दुखावले जातात ...

तुझा दुसरा प्रश्न यशस्वी आहे कि नाही.... वेताळा या प्रश्नाला तसा काही अर्थ नसतो  ... कारण यशाची किंवा  अपयशाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते ...
पैसा ,अडका , गाडी , बंगला याला जर का यश म्हणायचे तर त्यांनी ते नक्की कमावलेच...हे सगळे भौतिक यश ... पण कथेतील नायक या भौतिक गोष्टी वर विश्वास ठेवणारा नक्कीच नाही ...  माझ्या आणि नायकाच्या मते खरे तर या  वयात आर्थिक विवंचना नसणे , प्रकृतीच्या मोठ्या  तक्रारी नसणे , मुलांची आणि इतर जबाबदारी नसणे म्हणजे आयुष्य भर केलेले कष्ट सार्थक होणे  , हे खरे यश ....

नायकाने भौतिक आणि मानसिक दोनही आघाड्यावर नक्कीच यश मिळवले आहे ...

आता तिसरा प्रश्न, अपयश आणि यशात नियती चा हात कितपत असतो ...
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी मनुष्य कायम नियती चा उल्लेख नकारार्थी भावनेने करीत असतो ... नियती कडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची मुख्य गरज आहे ... अपयशा ला जर नियती जबादार असेल तर यशाला पण तीच आहे ना ? नियती हि आपल्या अंतर्मनातील एक शक्ती आहे ज्याला इंग्रजी मध्ये energy म्हणू शकतो.... तिचा आपण जसा वापर करू त्यावर यश आणि अपयश अवलंबून असते  ....  

शेवटी एक महत्वाचे माझे व पु म्हणाले तसे सांगतो " स्वतः ची यथार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो आणि स्वभमानी माणूस कायम यशाच्या शिखरावर असतो ..... "

एवढे बोलून विक्रमाने वेताळा कडे पहिले , वेताळाची शंका निरसन झाली असावी हि अपेक्षा ….
विक्रमादित्याचे बोलणे संपताच वेताळ खांद्यावरून उडाला व थेट वडाच्या पारंबीला लटकू लागला. सात मजली हास्य करत म्हणाला “विक्रमा, तू बोलसास आणि फ़सलास ! मी परत मोकळा झालो !  ….

शांतपणे विक्रमादित्य स्मशानाच्या बाहेर चालू लागला ….

बिपीन कुलकर्णी