Saturday, August 1, 2015

"लोकमान्य"


"लोकमान्य"                                                               ऑगस्ट २०१५
 

"कोण कुठला आहे हा इंग्लंड देश  …. आपण सगळे हिंदुस्थानी एकत्र येउन त्याच्यावर थुंकलो तरी त्यात वाहून जाईल …. "
लोकमान्यांचा भारदस्त आवाज ऐकून अंगावर शहारे येतात,

आमच्या सदोष शिक्षण पद्धतीने आम्हाला फक्त २ मार्कांचे टिळक , २ मार्कांचे महात्मा फुले, १० मार्कांचे गांधीजी , मार्कांचे सावरकर , मार्कांचे आंबेडकर शिकविण्यात धन्यता मांनली , एकूण काय तर आमचे महापुरुष मार्कात विभागले  त्या मुळे एकूणच ज्या वयात या महापुरुषांची ओळख होणे अपेक्षित असते ते वय सनावळ्या पाठ करण्यात गेले .

असो

मध्यंतरी लोकमान्य चित्रपट पहात असताना या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली , कारण शाळेत असताना आम्हाला लोकमान्य म्हणजे " मी शेंगा खाल्ल्या नाहीत , टरफले उचलणार नाही " किंवा " स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे , आणि तो मी मिळवणारच " या शिवाय टिळकांची ओळख काही झाली नाही .

केसरी कार टिळक जरी माहिती असले तरी , त्याच्या निर्मितीचा इतिहास आणि पडत्या काळात  केसरीला वाचाविण्या करिता खाल्लेल्या खस्ता बद्दल आम्ही अनभिज्ञ  असतो.
रक्त सांडल्या शिवाय मिळणार्या स्वराज्या ची किंमत राहणार नाही असे गांधीजींना ठणकावणारे लोकमान्य ! त्या वेळेस पर्यंत गांधीजी महात्मा झाले नव्हते , त्यांची ओळख फक्त मोहनदास करमचंद गांधी एवढीच होती.

लोकमान्यांचे रत्नागिरी पासून सुरु झालेले आयुष्य मुंबई मध्ये सरदार गृहात अंतिम श्वास घेवून चौपाटी वर अनंतात विलीन होई पर्यंत , म्हंटले तर फक्त फक्त ६४ वर्षाचे आयुष्य !
पण शेवटी  किती पेक्षा कसे जगलो हे  महत्वाचे. त्यांच्या कर्तुत्वावर नजर टाकली तर कळू शकते या ६४ वर्षात किती गोष्टी केल्या ?
 नसा नसात भिनलेली जाज्वल्य राष्ट्रभक्ती , एक निर्भीड पत्रकार , कायद्याची पदवी मिळविलेले वकील , महान गणिती , वैदिक गणिता वर असलेले प्रभुत्व , एक हाडाचे शिक्षक….

मराठी , संस्कृत इंग्लिश, फ्रेंच, जर्मन   पाली  या भाषांमधील त्यांचे ज्ञान वाचन ऐकून  थक्क व्हायला  होते

 टिळकांचा हिंदुत्ववाद आम्हाला कळलाच नाही….

संस्कृत भाषेवरील हुकुमत आणि गीतेवरील अभ्यास  आमच्या आकलना पडीकडे आहे.

७५ चा वर्ग काढण्या साठी calculator वापरणाऱ्या पिढीला , वैदिक गणिती च्या सहायाने शिकविणारे लोकमान्य खरेच  समजू शकतील का ?

लोकमान्यांच्या आयुष्याला .." You Will always Attract Towards what you are " हे इंग्रजी वाक्य तंतोतंत लागू पडते , राष्ट्रभक्ती या  समान धाग्या मुळे  लोकमान्य आणि युगपुरुष जोडले गेले. मग ते महात्मा ज्योतिबा फुले आहेत , महात्मा गांधी , स्वातंत्र्यवीर सावरकर , स्वामी विवेकानंद, सेनापती बापट , चापेकर बंधू पासून ते थेट लाला लजपत राय , बिपीन चंद्र पाल आणि अरबिंदो घोष पर्यंत…. अशी एक ना अनेक नावे. ..

नुसती राष्ट्रभक्ती असून उपयोग नसतो तर घर आणि संसारावर तुळशी पत्र ठेवण्याची तयारी असावी लागते, जो या सर्व राष्ट्र पुरुषांना जोडणारा समान धागा होता.

प्लेग च्या साथीत झालेला पुत्र वियोग किंवा मंडाले मध्ये शिक्षा भोगत असताना झालेला पत्नीचा मृत्यू , परिस्थिती ला धीरानी सामोरे जाताना लोकमान्यांचा शांत पणा पाहून , त्यांच्या अध्यात्म्याच्या अभ्यासाची कल्पना येऊ शकते 

एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथही प्लेगला बळी पडला. एवढे होऊनही लोकमान्य विचलित झाले नाहीत. मुलाच्या मृत्यूच्याच दिवशी सांत्वन करायला गेलेले जावई वि.. केतकर यांना लोकमान्य म्हणाले, ``अहो, गावची होळी पेटल्यावर प्रत्येक घरच्या गोवर्या जाव्या लागतात, त्याप्रमाणेच हे झाले !'' …. निशब्द ….

वयाच्या १६ व्या वर्षी (१८७२) लोकमान्यांचे वडील शेवटच्या दुखण्याने आजारी होते , तेंव्हा पितृ सेवा म्हणून लोकमान्य त्यांना भगवद्गीता वाचून दाखवत असत , पण ते वय भगवद्गीता समजण्याचे नव्हते पण मनात एकूण उत्सुकता आणि आवड उत्पन्न झाली आणि पुढे मंडाले मध्ये गीतारहस्य लिहिले ….
गीता रहस्य ग्रंथाच्या प्रस्तावनेत वरील विवेचन त्यांनी स्वतः केले आहे

पुस्तकाची अनुक्रमणिका , समर्पण आणि प्रस्तावना मंडाले मध्ये हस्त लिखीतात लिहून ठेवली होती , तसेच कोणत्या मजकुरा पुढे कुठला मजकूर घ्यायचा त्याच्या सूचना लिहून ठेवल्या होत्या , म्हणजे एकूण लिखित स्वरुपात ग्रंथ पूर्ण करून ठेवला होता , कारण मंडाले मधून जिवंत सुटू किंवा नाही याची त्यांना खात्री नव्हती पण काही झाले तरी आपण मिळविलेले ज्ञान भावी पिढीला मिळावे हि तळमळ होती



'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?' आणि `राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे !' हे लेख आमच्या आजकालच्या " लोकशाही चा चौथा स्थंभ म्हणवल्या जाणार्या पत्रकारीतील आजच्या " निर्भीड संपादक किंवा पत्रकार " म्हणविणाऱ्या लोकांनी वाचणे जरुरी आहे ….

एक तासाची चर्चा करून "समाज प्रबोधन " होत नसते …. त्या करिता विश्वासार्हता निर्माण करणे महत्वाचे ….

असो    


काही लोक केवळ ब्राम्हण द्वेष हा एक विषय समोर ठेवून , एकजात सर्व ब्रह्मणा ना झोडपून काढताना , राष्ट्र पुरुष पण यांच्या ओकारीतून सुटत नाहीत …. या  तथाकथित विद्वानांनी " टिळक चरित्रा " चा अभ्यास करून स्वतः चे आत्म परीक्षण करण्यची वेळ आली आहे … 

आपण भावी पिढी सोडा , सद्य पिढी करिता काय किंवा राष्ट्रा करिता काही केले किंवा करीत आहोत का ? याचा विचार आपण करणार आहात का ? का फक्त …… “उचलली जीभ आणि  लावली टाळ्याला”

जाताजाता , मंडाले मधून सुटका झाली तेंव्हा त्यांचे वय साठी कडे झुकले होतेखरे तर ते निवृत्तीचे वय, त्या वयात त्यांनी " पुनश्च हरी ओम " अग्रलेख लिहून भावी वाटचाली बद्दल कल्पना दिली   …  आम्ही सामान्य लोक याची कल्पना तरी करू शकतो का ? त्या मुळे उगाच या महापुरुषांच्या कर्तुत्वाची चर्चा करण्यात तोंडाची वाफ दवडणे यातच शहाणपण


लोकमान्यांचे कर्तुत्व एवढे महान कि  …  कै न. ची. केळकरा ना खंड लिहावे लागले किंवा कै गंगाधर गाडगीळा ना "दुर्दम्य " कादंबरी लिहिण्या करिता कित्येक वर्षे खर्ची घालावे लागली ,

मी पामर काय एका लेखात लिहिणारआज त्यांची पुण्यतिथीश्रद्धांजली म्हणून हा छोटा लेख !!       

टिळक पगडी घालून मिरवणारी आजची पिढी !! लोकमान्य त्यांना  थोडेसे तरी समजावे  हि अपेक्षा !!

राष्ट्रपुरुषांनी  धर्म किंवा जाती  भेदाच्या कक्षा केंव्हाच ओलांडलेल्या असतात , त्यांची विभागणी जातीत किंवा धर्मात  करणे जेंव्हा आम्ही थांबवू तोच खरा सुदिन ! आणि तीच खरी या महापुरुषा ना आदरांजली !!

बिपीन कुलकर्णी