Friday, September 30, 2011

आठवण!!!!

व्यक्ती चित्र लिहिण्याचे खूप दिवसा पासून मनात होतेतशा खूप व्यक्ती नजरे समोर आहेत पण सुरुवात  कोणा पासून करायची हे ठरत नव्हते, कारण कसे असते आपण जेंव्हा असा विचार करतो तेंव्हा डोळ्या समोर ज्या काही व्यक्ती येतात त्यांनी कळत अथवा नकळत आपल्या आयुष्यावर खूप प्रभाव टाकलेला असतो,मग त्यात पहिला मान कोणाचा? माझ्या किंवा आमच्या भावंडाच्या आयुष्यात सगळ्यात जास्त प्रभाव टाकला आणि त्यांच्या बाबत आमचे कधीच दुमत होऊ शकत नाही ते म्हणजे, ज्यांच्या नावाच्या मागे कै लावताना हात थरथरतो ते आमचे आजोबा नाना!!! आमचेच नाही तर आमचे सगळे मित्र मैत्रिणी नातेवाईक अख्या कॉलोनी चे नाना!!!.
जन्म फेब्रुवारी १९१६ आणि मृत्यू जानेवारी २००९खरे तर मी हा लेख लिहायला तब्बल .३० वर्षे उशीर केला, कारण एकदा माणूस गेल्या नंतर आपण किती जरी भावनिक लिहिले तरी ते ज्याच्या करिता असते ती व्यक्ती हे सगळे  समजण्याच्या खूप पलीकडे गेलेली असते...आणि असते ते फक्त आपले समाधान!!!
पिकलेल पान गळणारच असे म्हणून समाधान करून घेण्याची एक पद्धत आहे, पण हे मला तरी पटत नाही, पिकलेल पान गळाल्या नंतर होणारे त्या झाडाचे किंवा आजूबाजूच्या पानांचे दुखतेच जाणोत... तर आमच्या नानांचे  ९३ वर्षाचे आयुष्य!!! तसे म्हंटले तर ९३ वर्षाचा काळ खूप मोठा...पण वपू म्हणाले होते तसे "जुन्या पिढीतील लोकांचे वय हे सरलेल्या वर्षावर नाही तर सोसलेल्या गोष्टींवर ठरत असते" आणि तसे वय मोजायचे तर ९३ ला नक्की कितींनी गुणावे लागेल हे मी सांगू शकत नाही आणि प्रयत्न पण करणर नाही कारण उभ्या आयुष्यात त्यांनी कधी सोसलेल्या गोष्टींची जाणीव दिली नाहीउलट पक्षी त्यांनी गुणाकाराला भागाकारात बदलून जगण्याचा आनंद  घेतला....दीर्घ आयुष्य मिळायला गाठीशी पुण्य असावे लागते, आणि पुण्य मिळायला पण "Newtons Law of Motion  - Every  action  there  is  reaction is applicable आहे, कारण आपण आयुष्यात ज्या काही बर्या वाईट  गोष्टी करतो त्या वरच पुण्य ठरते हे मी सांगायची  गरज नाही... एकूण ती पिढीच अत्यंत प्रामाणिक तत्वनिष्ठ आणि साधी सरळ होती आणि त्याला आमचे नाना पण अपवाद नव्हते आणि नानांनी उभ्या आयुष्यात फक्त चांगल्याच गोष्टी केल्या..१०० रुपये पगार, बँकेची सतत २ वर्षांनी बदली होणारी नोकरी, मोठया प्रापंचिक जबाबदार्या हे सगळे असूनही स्वतःची ३ मुले आणि एका मुलीच्या बरोबरीने  अनेक भाच्या, पुतण्यांची शिक्षणे, नौकरी, लग्न  केली, त्या काळी "Mentor किंवा Local Guradian " हा शब्द प्रचलित नव्हता तर त्याला कर्तव्य आणि  जबाबदारी असे म्हणायची पद्धत होती, आणि नानांनी १००% त्या जाणीवेने केले... नंतर पुढील आयुष्यात या सगळ्याच  लोकांनी किंवा त्यांच्या  पू आंइ  वडिलांनी या सगळ्या केलेल्या गोष्टींची  जाणीव ठेवलीच असे काही नाही. पण प्रत्तेक वेळेस दान सत्पात्री पडेल असे सांगता येत नसते, आणि त्या मुळे दान करणारा थांबत नसतो आणि त्याच न्यायाने  नानांनी आयुष्यात या गोष्टीची कधीच खंत केली नाही, आणि कोणाला जाणीव दिली नाही...कदाचित ते पण दीर्घ आणि निरोगी आयुष्याचे रहस्य असू शकते.
नियती हा एक अजब प्रकार, त्या नियती ने पण आयुष्याच्या प्रत्तेक वळणावर परीक्षा पाहिली, पितृ छत्र तसे लवकर हरपले, आर्थिकमानसिक आघात झाले,अर्धांगिनी आयुष्याच्या मध्यावर सोडून गेली, बर्याचदा मी विचार करतो आजी च्या जाण्या नंतर ३९ वर्षे कशी काढली असतील? ३९ वर्षे केवढा मोठा काळ!!! यांना कधीच एकटेपणा वाटला नसेल? कधी मन व्याकूळ झाले नसेल? आपण हे समजू शकतो पदो पदी  त्यांना  आठवण  येतच  असणार  तरी  कधीही  त्यांच्या तोंडून  त्यांच्या  दुखाचा  एक  शब्द   ऐकला नाही , कायम  त्यांनी  सगळ्यात  रमून  आनंदी राहायचा  प्रयत्न  केला, दुसर्यांच्या  आनंदात  त्यांनी  कायम  आनंद   मानला कसे जमले हेआपल्या पैकी किती जणांना जमेल असे वागायला?......या सगळ्या प्र्षांची उत्तरे नियतीच देते, ज्या नियती ने आजी ला नेले, त्याच नियती ने ३ सोन्या सारखी मुले दिली आणि त्या बरोबर सुनाही तशाच दिल्या आणि या ६ जणांनी नाना च्या जीवनाची "संध्या छाया" होऊ दिली नाही!!! नाहीतर आज काल कितीतरी घरातील वृद्धांच्या आयुष्याची  गणपतराव बेलवलकर सारखी  शोकांतिका झालेली पाहतो इथे तसे न होता नानांचे आयष्य "आनंदाचे झाड झाले"..सुना आणि मुलांनी जसे केले तसेच त्यांनी पण केलेल्या गोष्टीत समाधान मानून घेतले. याच नियती ने त्यांना सहस्त्रचंद्र दर्शन घडवले, पतवंड कडून सोन्याची फुले वाहून घेण्याचा योग घडवून आणला...हे सगळे वाटते तेवढे सोपे नाही. तसेच जर का असते तर दाजी काका गाडगीळांना " आमच्या कडे पणजोबा करिता सोन्याची तयार फुले मिळतील" असे सांगावे लागले असते, तसेच पुण्यात श्राद्धा च्या स्वयपाकाची जाहिरात  करून विकणारे व्यावसाईक असताना त्यांना सहस्त्र चंद्र दर्शनाकरिता १००० दिवे विकायची कल्पना सुचली नसती का?  पण तसे नाही या लोकांना त्याच्या खपाची जाणीव पण आहे ? या २ उदाहरण वरून आपल्याला कळू शकेल हे सहज योग नाहीत. आणि हे योग येण्या करता इच्छा शक्ती दांडगी असायला पाहिजे, प्रत्तेक गोष्टीत समाधान मानायचा स्वभाव असायला पाहिजे... आणि दुसर्याच्या आनंदात आनंद घेता यायला पाहिजे? हे लिहिणे सोपे आहे पण आचरणात आणायला तेवढेच अवगढ.!!!!! पण हि प्रत्तेक गोष्ट नाना जगले......
साधी गोष्ट त्यांचा प्रत्तेक वाढदिवस म्हणजे " चांदीच्या ताटात बासुंदी चे जेवण" जे त्यांनी अगदी शेवटच्या वाढ दिवसा पर्यंत एन्जॉय केले...अत्रे मागे म्हणाले होते वयाच्या सत्तरी  नंतर बरेच लोक वाढदिवसा ला  "काढ दिवस " समजतात...आणि एकदा का मनात तो विचार आला कि खरेच काढ दिवस सुरु होतात.हे न वाचता नानांना कदाचित समजले होते , म्हणूनच शेवटच्या दिवसा पर्यंत चेहर्या वर कधी आढी आली नसावी.
स्वतःची  मत  त्यांनी  कधीही  कोणावर  लादली  नाहीत,सगळे  म्हणतील  तशी  तयारी  असायची, त्यांना  दुसर्यांचीमने  सांभाळणे  कसे  जमले हे  न उमगलेलं कोडे आहे. जेवढ्या  आवडीने  त्यांना देव दर्शन करायची हौस होती जसे  अक्कलकोट , गाणगापूर, नीरा  नरसिंगपूर अष्ट  विनायक असो किंवा कारंजा या सगळी कडे जायला  आवडायचे  तेवढ्याच  आवडीने   आम्ही  कॉलेज  ला  असताना  पहाटे उठून   आमच्या  बरोबर  “क्रिकेट  मेचेस” पाहायचे.
अशा एक ना अनेक आठवणी कि ज्या एका लेखात संपूच शकत नाहीत...पण १५ दिवसा पूर्वी पितृ पंधरवड्यात त्रीतीयेला जेव्हा त्यांची तिथी  होती तेंवा मनानी उचल खाल्ली आणि मनात जे आले ते लिहून काढले....

अपूर्ण....