Sunday, September 16, 2012

कर्ण - पहिला पांडव का १०१ वा कौरव?


                                                    १६ सप्टेंबर २०१२

महारथी ,दानविर, कौतेय, सूर्यपुत्र, अंगराज अशा एक ना अनेक उपाध्या मिळालेले महाभारतातील व्यक्तीचित्र...महाभारतातील कर्णाचे नेमके स्थान काय? नायक का खलनायक?हि व्यक्तीरेखा महाभारतीतील शोकांतिका...आणि शोकांतिकेच्या नायकाला अजरामर करायची एक परंपरा, त्या मुळे कर्ण महाभारतातील अनेक नायका पैकी एक ठरतो.
अर्जुनाच्या बरोबरीने ज्याची धनुर्विद्या होती असा असामान्य धनुर्धर , सूर्याचा निस्सीम उपासक , थोर दानशूर , मातृ पितृ भक्त , हेवा वाटावे असे सुंदर आणि तेजस्वी रूप , धर्म आणि युद्ध शास्त्र पारंगत असा तो कर्ण!!ज्याचा जन्म कवच कुंडला सहित झाला...जो साक्षात सूर्याचा पुत्र..अशा अंग देशाच्या राजाची शोकांतिका का झाली??
सामान्य वाचकाला कर्णा बद्दल प्रचंड सहानभूती वाटते, त्याला कारणेही तशीच,
१. मातेने जन्मतः नकळत केलेला अन्याय.
२.सुत पुत्र म्हणून हिणाविला गेलेला एक क्षत्रिय
३. अर्जुन प्रेमा पोटी द्रोणानि ब्रम्हास्त्र नाकारलेला एक महारथी
४. द्रौपदी स्वयंवरात झालेला अपमान न विसरलेला सूतपुत्र
५.साक्षात इंद्राला कवच कुंडले दान करणारा दानवीर
जो प्रती दिन स्नाना नंतर सूर्याचे उन पाठीवर घेवून पाठ तापे पर्यंत सूर्याची उपासना करत असे..... सूतपुत्र म्हणून अवहेलना होत असताना, परम मित्र दुर्योधनाने दिलेले "अंगराज" पद आणि त्या नंतर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून आयुष्यभर निभावलेली मैत्री... अशा अनेक अकल्पित घटनांनी भरलेले जीवन ...त्याचा शेवट असा विदीर्ण व्हावा
ज्याच्या एकट्याच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवून दुर्योधनाने युद्धाचा डाव मांडला होता तोच हा महारथी..., तोच कर्ण स्वतःच्या अहंकाराला ठेच पोहोचल्या मुळे पहिले १० दिवस युद्ध भूमी पासून दूर राहिला.. पण नंतर भीष्म आणि द्रोणाच्या पतना नंतर एकट्या कर्णाने पांडवाचे अर्धे सैन्य खलास केले हा इतिहास आहे... आणि याच युद्धात त्याचा शेवट आणि कुलाचा नाश व्हावा..
कर्ण हा अर्जुनापेक्षादेखील श्रेष्ठ धनुर्धर होता हे स्वतः कृष्णाने आणि परशुरामांनीदेखील मान्य केलेले आहे.
“हे भिमा, जरी तुम्ही अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर मानत असलात तरी खरा सर्वश्रेष्ठ हा कर्ण आहे. मला, परशुरामांना व युधीष्ठीरालाही ते माहीत आहे. दोन शाप आणी कवच कुंडलांच्या दानामुळे तो आअता अर्धरथीही उराल नाहिये परंतु असे नसते तर आज तो माझ्या सुदर्शनचक्रालाही अवध्य असता हे लक्षात ठेव. तुझा मुलगा एका शुरासारखा मृत्यु पावला, कर्णाच्या हातुन त्याचा मृत्यु हा सन्मान आहे हे समज आणी दु:ख आवर” असे सांगत कृष्णानी सर्वच पांडवांचे सांत्वन केले. (द्रोण पर्व : दिवस १४) )
असा हा "महारथी" पण भर सभेत त्याची योग्यता पितामह भीष्मांनी "अर्धरथी" म्हणून केली....
कर्ण चरित्रातील या ठळक घटना कर्णा ला नायक करण्यास पुरेशा आहेत...आणि एकांगी विचार केला तर तो महा नायक ठरतो, मग प्रश्न असा पडतो अशा नायकाची शोकांतिका का व्हावी?
हि शोकांतिका स्वतः ओढवून घेतलेली..त्याच्या आयुष्याच्या सर्व बाजूवर नजर टाकली तर त्याचे काही अवगुण पण लक्षात येतात ..अहंकार... स्वतः बद्दल नको तितका आत्मविश्वास...अमर्याद महत्वाकांक्षा..अर्जुना बद्दल आणि त्या मुळे पांडवा बद्दल पराकोटीचा मत्सर...तसेच आयुष्यात केलेल्या काही चुका....जसे कि परशुरामा ला फसवून शिकलेले शापित ब्रम्हास्त्र, ब्राम्हणा कडून घेतलेला शाप आणि या वर कळस म्हणजे द्रौपदी वस्त्र हरणाच्या वेळेस ची त्याची वागणूक!!! या सगळय गोष्टींचा शेवट कर्माच्या सिद्धांता मुळे एका शोकांतिकेत झाला.
एक विचार असा येतो कि झालेल्या अन्याया मुळे कदाचित वागण्यात कडवट पणा तर आला नसेल? आणि तसाविचार करायचा तर महाभारतात फक्त कर्णा वरच अन्याय झाला का ? तसे पहिले तर विदुरा वर सगळ्यात जास्त अन्याय झाला,धृतराष्ट्रापेक्षा किती तरी अधिक पटीने राजा होण्यास लायक, पण केवळ दासी पुत्र म्हणून राज योगा पासून वंचित राहिलेला...पितामह भीष्म ज्याने पूर्ण आयुष्य फक्त त्याग आणि त्याग करण्यात घालवले...सावत्र आई ला दिलेल्या वचना करिता आजन्म ब्रम्हचारी राहिलेला आणि राज्याभिषेका पासून दूर राहिलेला..नकुल आणि सहदेव पाच पांडवा पैकी तसे थोडेसे दुर्लक्षित आणि कमी वलयांकित..ह्या सगळ्या व्यक्तींच्या वागण्यात का कडवट पणा आला नाही?
तसेच अनेक प्रश्न कर्ण चरित्रात अनुत्तरीत राहतात -
१. अर्जुना बद्दल मनात इतका राग असण्याचे कारण काय? केवळ आपल्या पेक्षा सरस धनुर्धारी आणि आपल्या परम मित्र दुर्योधनाचा वैरी म्हणून...
२. द्रोपदी स्वयंवरात जाऊन अपमान करून घेण्याची खरेच गरज होती का ? एवढा धर्म शास्त्र पारायण, त्याला या साध्या गोष्टीची जाणीव नसेल   कि , द्रोपदी स्वयंवरात आपले कुळ आडवे येऊ शकते...
३. दुर्योधनाने अंग देशाचे राज पद दिलेले असताना, दिवस रात्र हस्तिनापुरातील राजकारणात ढवळा ढवळ करण्याची खरेच गरज होती का?
४. केवळ अर्जुना कडे ब्रम्हास्त्र आहे, म्हणून केवळ त्याच्या मत्सरा पोटी, परशुरामाला फसवून ब्रम्हास्त्र विद्या शिकायची गरज होती का?
५. द्रोपदी वस्त्र हरणं प्रसंगाच्या वेळेस द्रोपदी ची अवहेलना करताना कर्णाने कुठलाही विधिनिषेध ठेवला नव्हता,,,केवळ त्याने उद्य्क्त केल्या मुळे दुशासन तिला सभेत घेवून आला...खरे तर ती सभा किंवा तो द्यूताचा खेळ म्हणजे कौरव आणि पाण्डवातील म्हणजे भावंडातील कौटुंबिक बाब...त्यात कर्णाने हस्तक्षेप किंवा ढवळा ढवळ करण्याची काहीच गरज नव्हती...पण त्या प्रसंगी केवळ स्वयंवर प्रसंगी झालेल्या अपमानाचा बदला घेण्याची संधी साधली
तसे पाहता महाभारत काळात सगळे राजे महाराजे ब्राम्हणांना दान करत असत...मग केवळ कर्ण एकटाच दान वीर का ठरला? त्याचे कारण त्याने साक्षात इंद्राला दान केलेली कवच कुंडले!!! पण दान हे नेहमी निरपेक्ष असते..इथे कवच कुंडले देताना इंद्रा कडून २ गोष्टी मिळवल्या...एक म्हणजे कवच कुडाला शिवाय सौंदर्य अभादित राहील आणि दुसरे मुख्य इंद्रा कडून घेतलेली वासवी शक्ती... आता याला दान म्हणायचे का ?? हा तर झाला व्यवहार....
हाच कर्ण काही वेळेस मनाचा अत्यंत मोठे पणा दाखवतो...
कृष्ण शिष्टाई नंतर श्रीकृष्ण जेंव्हा कर्णाच्या भेटीस गेला आणि त्या भेटीत कर्णाने पांडवांच्या बाजूने येण्या करिता मन वळविण्याचा प्रयत्न केला तेंव्हा कर्णाने जे स्पष्टीकरण दिले त्याला खरेच तोड नाही, तसेच कुंती ने आणि भीष्मांनी जेंव्हा त्याच्या जन्माचा इतिहास सांगितला तेंव्हा चे त्याचे वागणे आणि कुंतीला दिलेले वचन " तुझे ५ पांडव जिवंत राहतील" आणि त्या नंतर युद्धात अर्जुन सोडून ४ पांडवाना जेरबंद केल्या नंतर दिलेल्या शब्दाला जागून, चौघांना जीवनदान देणे...यातून त्याच्या मनाचा मोठे पणा दिसून येतो...
नियतीचा डाव तरी कसा-
अभिमन्यू सारख्या कोवळ्या पोराला कर्णा सहित सगळ्या योद्ध्यांनी चक्रव्युहात अडकवून अर्जुनाच्या अपरोक्ष मारले....त्याच अर्जुनाने कर्णाच्या मुलाला वृशसेनला कर्णा समोर मारले ....कर्णा समक्ष अर्जुना ने जयद्रथा चा वध केला...या दोनही प्रसंगात कर्ण हतबद्ध होता...
जी वासवी शक्ती अर्जुन वधा च्या अपेक्षेन घेतली होती, ती वापरावी लागली घटोतकाचा वर....ब्रम्हास्त्र अर्जुना करिता राखून ठेवलेले..शापित असल्या मुळे त्याचाही उपयोग नाही
कौरवांच्या नादी लागून ज्याने अनीती आणि अधर्मा ने वागण्यात धन्यता मानली...त्यने आयुष्याच्या शेवटच्या क्षणी अर्जुन आणि श्री कृष्णाला धर्मा ची आठवण करून देवून धर्माने वागण्याची अपेक्षा करावी....
आणि या सगळ्याची अखेर कर्ण वधात झाली...
कर्ण जन्माने क्षत्रियच होता आणि मृत्यू नंतर पण पांडवानी त्याचे अंत्यसंस्कार क्षत्रिय रिती प्रमाणेच केले....""दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम् ॥" हे सुभाषित काही अंशी खरे पण करून दाखविले!!!
त्या मुळे कर्ण म्हणजे कौरव का पांडव हे खरेच गूढ!!! आणि ते ठरविणारे आपण तरी कोण?
बिपीन कुलकर्णी

संदर्भ - युगांत, व्यास पर्व , कर्ण कोण होता

Friday, July 20, 2012

कॉर्पोरेट विश्वातील महाभारत!!!!!




कॉर्पोरेट विश्वातील महाभारत!!!!!

                                                                           २० जुलै २०१२

व पु नि "आपण सारे अर्जुन" पुस्तकात अर्जुनाच्या कुरुक्षेत्रावारच्या आणि मध्यम वर्गीय माणसाच्या आजकालच्या परिस्थितीतील सारखेपण छान सांगितले आहे... वाचताना जाणवते कि खरेच आपण आणि अर्जुन सारखेच... कारण आपल्या पण मनात असेच असंख्य प्रश्न असतात
पुढे जाऊन मला वाटले वाटले कि फक्त अर्जुनच का? महाभारतातील प्रत्तेक व्यक्ती आणि आपण सारखेच!!! .
महाभारत नेहमीच आपल्याला जवळचे वाटते, त्याला तशी दोन कारणे -
  1. त्यातील प्रत्तेक व्यक्ती तुमच्या आमच्या सारखी कधी ना कधी चुका करणारी
  2. प्रत्तेक व्यक्तीच्या मनस्थितीतून आपण कधी ना कधी गेलेलो
महाभारताला खरे तर " सत्य असत्य", "धर्म अधर्म" किंवा "नीती अनीती" ची लढाई म्हणतात, पण माझ्या मते ती फक्त प्रत्तेकाच्या अस्तित्वाची लढाई होती.....
कारण धर्म अधर्म किंवा नीती अनीती म्हणायचे तर, कौरवांची बाजू कायम अधर्माची होतीच पण -
  1. "नरोवा कुंजरोवा "करणाऱ्या युधिष्ठिराची बाजू खरेच सत्याची होती का?
  2. शिखंडीच्या मागे लपून भीष्मा वर वार करिताना कुठे गेला होता पांडवांचा धर्म?
  3. जमिनीत रुतलेले चाक काढायची धडपड करत असणाऱ्या निशस्त्र कर्णा वर वार करणे हि कुठली नीती
पु लं च्या "बिगरी ते मैट्रिक" मधील एक पात्र विनोदाने म्हणते " कृष्ण पण कर्णा बरोबर चीडीचाच डाव खेळला".......विनोद थोडा वेळ बाजूला ठेवून विचार केला तर काही अंशी खरे पण आहे...
असाच चिडीचा डाव आपण पण कधी ना कधी खेळत असतो त्या मुळे पांडव आपल्याला सतत जवळचे वाटतात,
आपल्या Professional Life मध्ये अशा गोष्टी कायम घडत असतात पण " Action पेक्षा Intention " ला जास्त महत्व देऊन प्रत्तेक गोष्टीचे समर्थन केले जाते....मग तोच नियम महाभारतातील घटनांना पण लागू करायला हवा ना...
रोजच्या "So Called Professional Life " मधली काही उदाहरणे -
  1. मिटींग्स मध्ये बहुतेकदा आपण तेच बोलतो कि जे आपल्या BOSS ला ऐकायला आवडते - मग आता सांगा द्रौपदी वस्त्र हरण प्रसंगाच्या वेळेस भीष्म किंवा विदुर जे वागले ते काय चुकीचे होते?..."सत्ते पुढे शहाणपण चालत नाही" म्हणतात ते असे.
  2. Performance Review Meeting च्या वेळेस आपली जी चर्चा होते, आणि त्या नंतर मिळणाऱ्या Increment Letter मुळे आपल्याला BOSS एकदम "सुई च्या आग्रा एवढी पण जमीन देणार नाही" म्हणणारा दुर्योधन वाटू लागतो!!!!
  3. "नरोवा कुंजरोवा " करणारी माणसे " Good Diplomats " किंवा "Best Interpersonnel Relationship " असलेली ठरतात
  4. एखादा न पटलेला निर्णय घेत असताना आपली परिस्थिती अर्जुना सारखी होते आणि त्या वेळेस आपला BOSS आपल्याला गीता सांगून तो निर्णय घेण्यास भाग पाडतोच....याला काय म्हणायचे? धर्म का अधर्म!!!
5.   कौरवांचे दुर्योधनाने देऊं केलेले सेनापतिपद भीष्माने खळखळ न करतां स्वीकारलें.फक्त एकच अट घातली कीं ’एकतर कर्ण किंवा मी, एकच कोणीतरी लढेल’. यात एक गोष्ट दिसून येते कीं युद्धावर नियंत्रण ठेवण्याचा त्यांचा हेतु असावा....यालाच आजच्या भाषेत Selfish किंवा Egoistics म्हणतात!!! यात कर्णा बद्दलची भीती आणि त्यातून कर्णाचे महत्व कमी करायचा उद्देश असावा...असे आपल्या कामाच्या ठिकाणी नेहमीच होत असते ना

6.     ह्या भीष्माच्या निर्णयाने कर्णाला १० दिवस युद्ध भूमी पासून दूर ठेवले...कर्ण जर पहिल्या दिवसा पासून युद्धात सामील झाला असता तर कदाचित चित्र बदलेलेही असते..या जर तर च्या गोष्टी...पण असे दोन जणांचे इगो कितीतरी वेळा आजूबाजूच्या लोकांचे मोठे नुकसान करतात. आपणही हे अनुभवतोच ना
7. अधिकार आहे म्हणून एखाद्या चांगल्या माणसाचे पंख कापून त्याला कमी महत्वाच्या प्रोजेक्ट वर पाठवणे, किंवा महत्व कमी करणे....यात आणि द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागण्यात तसा काही फरक नाही!!!
8.. एखाद्या complecated issue वरचा मेल जेंव्हा फिरत असतो तेंव्हा प्रत्तेक जण मेल वाचून"Adding XXX" करत असतो...हे स्वतःचे अस्तित्व दाखवणे नाही तर काय
 हि झाली काही उदाहरणे...ऑफिस सरकारी असो किंवा खाजगी सगळी कडे हीच वृत्ती...कारण काम करणारी सगळी माणसेच ...मनुष्य स्वभाव इथून तिथून सगळी कडे सारखाच...मग तो महाभारतात तरी कसा वेगळा असू शकेल..

कुठल्याही ऑफिस चे वातावरण त्यातील वरिष्ठ कसे वागतात या वर ठरते,वरिष्ठाला जर का अंतर्गत राजकारणात रस असेल तर नक्कीच त्या ऑफिस चे वातावरण तसे निर्माण होते...

तशी महाभारतातील ठळक पत्रे म्हणाल तर - युधिष्ठीर,अर्जुन, भीम,दुर्योधन,कर्ण,भीष्म,धृतराष्ट्र,कृष्ण,गांधारी,कुंती आणि द्रौपदी...तसे बाकी पण खूप आहेत...पण हि पात्रे म्हणजे संस्था आहेत....कारण यांच्या कडे पाहून अनेक पिढ्या घडत आहेत...

मग ते युधीशिठीरा सारखे "नरोवा कुंजरोवा" करणारे असो, अर्जुना सारखे कर्तुत्व असून कायम गोंधळलेले, गांधारी सारखे दिसत असून डोळे बंद करून घेतलेले, कर्णासारखे " Right Person in Wrong Party " , धृतराष्ट्रा प्रमाणे आंधळे पणाने चुकीच्या व्यक्तीला पाठींबा देणे, कुंती प्रमाणे आपल्या एका चुकीची शिक्षा एका पिढीला भोगायला लावणे किंवा युद्धाच्या आदल्या दिवशी नात्याची आठवण करून देण्या करिता कर्णाला भेटणे...असे किती तरी लोक आपल्या आजू बाजूला असतात...

एक Mangment Principle आहे "You Will Always Attract Towards What You Are " तुम्ही विचार करा आणि आणि तुमच्या आजूबाजूला बघा...

आणि .कदाचित या Principle मुळेच कर्ण दुर्योधना कडे किंवा दुर्योधन कर्णा कडे आकर्षित झाला असेल!! असे आपल्या office मध्ये घडतेच ना...

पण त्यातून चांगले आणि वाईट याचा भेद करू शकणाराच "Succesful & Effective Manager " होऊ शकतो.

कधी कधी एखादा अधिकारी एखाद्याला एका रात्रीतून "सुतपुत्राचा"  "आंगराज"करतो... अशा वेळेस आपल्याला प्रचंड यातना होतात, त्रास होतो, आपण त्रागा करतो......पण अशा गोष्टी चीर काळ टिकणार्या नसतात कारण अशा वेळेस कर्णाचेच सुभाषित आठवते ""दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम् ॥" "दास असो वा दासीपुत्र, जो कोणी मी असू दे. कोणत्या कुळात जन्माला यायचे ते नशीबावर अवलंबून असते, पराक्रम मात्र स्वतःवर." तसेच कुठे काम करायचे, कोण Boss असेल हे सगळे गौण...."Ultimately Your Skills Pays Your Bills"

कृष्ण शिष्टाई जेंव्हा असफल झाली आणि युद्ध अटळ आहे हे कळाले तेंव्हा भीष्मा नि कौरव आणि पांडवाच्या सगळ्या योध्याचे जे काही जे विश्लेषण केले होते त्यालाच आजच्या भाषेत SWOT Analysis म्हणतात...

कृष्ण जेंव्हा कुरुक्षेत्रा वर अर्जुनाला गीता सांगत होता तेंव्हा ती किती जणांनी ऐकली ? उत्तर आहे तीन (अर्जुन, संजय & धृतराष्ट्र) पण अर्जुना ला जे समजले ते बाकी दोघांना का नाही उमजले? कारण "Your Success is largely depend on ability to see things as they are "

कुरुक्षेत्रावर जेंव्हा कर्णा च्या रथाचे चाक धरणीने गिळले, शल्य जो कि त्याचा सारथी होता त्याने मदतीला नकार दिला कारण ....." Thats Not My Job " हे त्याचे उत्तर होते...असा अनुभव आपल्याला पण येतोच ना, गंभीर परिस्थितीत आपली म्हणणारी माणसे पाठ फिरवितात किंवा ज्यांच्या विश्वासावर किंवा भरवशावर एखादी उडी घ्यावी तर ते लोक बाजूला होऊन मोकळे होतात.

तसा जर का विचार केला तर चाक जमिनीत रुतल्या नंतर ते चाक काढणे त्या वेळी महत्वाचे होते का? तो रथाचा वापर करता लढू शकत नव्हता का ? त्याने बाण का नाही मारले?? याचे Management च्या भाषेतील उत्तर " Your Focus Goes Your Energy Flows "

असे आपण कितीतरी वेळा वागत असतो...ज्या वेळेस आपण स्वतःला Managment Priorities शी Allign करू शकत नाही त्या वेळेस आपला कुरूक्षेत्रा वरचा कर्ण होतो...म्हणजेच "Any Point of Time you should be in a position to understand situational Priorities "

ऑफिस मध्ये आपण जुने मेल्स जपून ठेवतो कारण आपल्याला माहिती असते कधी तरी आपल्यावर पण "हा सूर्य आणि हा जयद्रथ" करायची वेळ येऊ शकते

ह्या अठरा दिवसाच्या कुरुक्षेत्रानी तसे आपल्याला खूप शिकवले

मी वर म्हणालो तसे ह्या सगळ्या महाभारतातील व्यक्ती म्हणजे एक एक संस्था आहेत...आपल्या आजू बाजूला जरा डोळे उघडून पहिले तर असे किती तरी लोक दिसू शकतात? आजूबाजूलाच का? आपण पण त्यापैकी एक असू शकतो? म्हणूनच मी म्हणलो कि आपण पण " रडीचाच डाव खेळत असतो"

पण हे सगळे नीती - अनीती, धर्म - आधार्मा ला धरून जे काही वागत करत असतो ते फक्त  स्वतःचे अस्तित्व टिकविण्या करिताच ना......



बिपीन कुलकर्णी





Friday, June 8, 2012

"तीर्थरूप"

"तीर्थरूप"                                                 ८ जून 2012



तीर्थरूप या शब्दाचा अर्थ आहे जन्मदाते म्हणजेच "वडील" 
तीर्थरूप म्हणजे जे तीर्था समान आहेत तेहिंदू धर्मात तीर्थ   हे सर्वात पवित्र आणि अनेक जन्माचा उद्धार करणारे मानले जातेत्याच्या प्रमाणे वडील हे आपल्या मुलांचा त्या जन्माचा उद्धार करतात म्हणून वडिलांना तीर्थरूप हा शब्द आहे पण आज काल या शब्दाचा उपयोग जास्त करून विनोद निर्मिती करण्या करिता होतो, जेंव्हा या शब्दावरून झालेले विनोद ऐकतो तेंव्हा खरेच काळजात चर्र..होते आणि असे विनोद करणाऱ्या लोकांच्या अकलेची कीव येते. वडिलांबद्दल  फार  कमीच  लिहील  जात ...घरातले ते  एक  असे  व्यक्तिमत्व  असते  ज्यामुळे  घराला खरे तर  आधार  मिळतो पण असे असून सुद्धा तसे पहिले तर वडील हे नाते आपल्याकडे गृहीत धरलेले आणि दुर्लक्षित...इंग्रजी मध्ये ज्याला "Thankless Job"म्हणतात तसे. याची सुरुवात अगदी पुराण काळात झालेली आणि नंतर इतिहासाने त्याचीच री ओढत पुढे आमच्या साहित्याने आणि चित्रपट सृष्टीने ती परंपरा पुढे चालू ठेवण्यात धन्यता मानली!!
आई  म्हणजे जर का ज्योत असेलजी पूर्ण घराला प्रकाश देते तर वडील म्हणजे समईत्याची जबाबदारी ज्योती ला आधार देण्याची...पण नकळत पणे आपण समई ला महत्व देत नाही...समई चे स्वतःला चटके  बसवून घेण्याचे दुखआपल्याला कळत नाही    
प्रत्तेक ठिकाणी वडील या नात्यावर अन्याय केला आहे असे मला वाटते...
कर्णाला नेहमी हिणविण्या करिता "सूतपुत्र" या शब्दाचा वापर झाला, पण जेंव्हा त्याचे उदात्तीकरण करायची वेळ आली तेंव्हा शब्द आले  "कौन्तेय" आणि "राधेय"!! आपल्या पैकी किती लोकांना माहिती आहे वडील सारथी होते आणि ज्यांच्या मुळे कर्णाला सूतपुत्र म्हंटले गेले, त्या सारथ्याचे नाव अधिरथ होते, आणि कर्णाला वाढविण्यात जेवढा राधे चा वाटा आहे कदाचित त्याहून थोडा मोठा वाटा अधीरथा चा कर्णाला धनुर्धारी करण्यात होता...पण दुर्देवा ने अधीरथा च्या वाटेला फक्त उपेक्षा आली.
इतिहास कारांनी  श्री कृष्णा च्या बाबतीत  देवकी आणि यशोदेला  जेवढे महत्व दिले तेवढे वासुदेवाला न देवून त्यांच्यावर अन्यायच केला आहे...श्री कृष्णा ला कंबरे एवढ्या पुराच्या पाण्यातून डोक्यावर टोपलीत नेणारा वासुदेव, त्या पुढे सामान्य माणसाला वासुदेवाची ओळख नाही..खरे तर "दिलेला शब्द पाळणारा" किंवा " सत्यवचनी "  म्हणून धर्मराज अर्थात युधिष्ठर सर्वाना परिचित पण तसा वासुदेव किती जणांना परिचित आहे?
येशू क्रीस्था च्या बरोबरीने मदर मेरी चे स्थान समाजात आहे  पण सेंट जोसेफ जे येशू क्रीस्था चे वडील  ज्यांचा उल्लेख बायबल मध्ये  गुणवान , पुण्यवान , सत्वगुण असलेला , सदाचरणी माणूस म्हणून केलेला आहे, त्यांच्या बाबतीत माहिती किती लोकांना आहे?
जिजाई नि शिवाजी महाराजांना घडवले यात वादच नाही, पण त्याच वेळेस शहाजी राजांची विजापूर दरबारात होणारी ओढाताण आपण लक्षात घेवून, शहाजी राजांना शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत किंवा यशात जेवढे द्यायला पाहिजे तेव्हडे स्थान देतो का?

आई घराचे मांगल्य असते तेंव्हा  वडील घराचे अस्तित्व असतात? पण दुर्दैवाने अस्तित्व संपल्या नंतरच अस्तिव नसल्याची जाणीव होते, पण त्या वेळेस खरे तर खूप उशीर झालेला असतो.
असे असून सुद्धा या अस्तित्वा बद्दल कधीच आम्ही का बोलत नाही? 
पडलो किंवा खरचटले कि लगेच तोंडातून निघत "आई गं!" पण मोठे संकट आले कि  " बाप रे!" असे उद्गार तोंडातून निघतात. कारण छोट्या संकटांसाठी आई आठवत असली तरी मोठी वादळे पेलताना बाबांची साथ लागते, हा जगाचा नियम आहे.... 
मुलांच्या जन्माच्या वेळेस आईनि भोगलेल्या शारीरिक यातनेची आम्ही जाणीव ठेवतो, पण त्याच वेळेस दवाखान्यात अस्वस्थ पणे येर झार्या घालणार्या वडिलांच्या अस्वथतेची ची जाणीव आपल्याला नसते महिन्या पूर्वीचे उदाहरण, माझ्या भाची च्या सई च्या जन्माच्या वेळेस, अशीच धाव पळ करावी लागली आणि त्या बाळाला ऐन वेळेस सह्याद्री हॉस्पिटल मध्ये हलवावे लागले...आई एका ठिकाणी आणि बाळ दुसर्या दवाखान्यात...प्रत्तेक जण येणारा आई आणि लेकी  बद्दल बोलत होता....पण योगेश म्हणजे सई च्या बाबाची परिस्थिती कशी होती, लेकरा करिता कसा जीव तुटत होतालेकरू सह्याद्री हॉस्पिटल च्या डॉक्टर्स कडे देताना त्याला किती यातना होत होत्या  ते मी फार जवळून पहिले पण काय आहे ना आपला समाज हे वडिलांचे दुखसमजूनच घेत नाही

या सगळ्यात कुठेही आईचे महत्व कमी करायचा प्रयत्न नाही..खरे तर ते कमी होऊ पण शकत नाही...पण त्याच वेळेस वडील या नात्याला थोडासा न्याय मिळायला हवा असे सारखे मनात येते.थोडे आठवून पाहायचा प्रयत्न करा- वडिलांची महती सांगणाऱ्या कविता, गाणी, श्लोक...आठवताहेत नाही ना??

आपल्या साहित्यातील आत्मचरित्रे वाचून बघा, बहुतेक ठिकाणी स्वतःचे मोठे पण सांगताना  लहान पणी वडिलांनी केलेला अन्याय सांगून नकळत त्यांना खलनायक बनवून स्वतःकडे वाचकांची सहानभूती घेण्याचा प्रयत्न करीत असतात..असे करून आम्हाला काय मिळते? लहान पणी वडील तसे का वागले याचा शोध घेण्याचा प्रयत्न कधी केला का?? खरेच वडिलांना तसे वागण्यात आनद मिळत होता का याचा शोध घेण्याचा विचार का करीत नाही? हे असे लिहिणारे लोक सोईस्कर पणे Genetics चे नियम विसरतात...
बर्याच ठिकाणी वडिलांचे जे चित्र रेखाटले आहेत ते तापट, व्यसनी किंवा मारझोड करणारे...समाजात ५-१०% असे असतीलही, पण बाकी ९०% चांगल्यांचे काय?
साहित्यात याला काही अपवाद आहेत जसे की व पु नि लिहिलेले "व पु सांगे वडिलांची कीर्ती"   
किंवा कविते च्या बाबतीत सांगायचे तर " दमलेल्या बाबाची कहाणी" असे फार मोजकेच अपवादात्मक... पण दुर्दैवाने बाकी सगळ्या ठिकाणी एकवचनी अनादार्थी उल्लेख !!!!
आपल्या बाल पणाच्या कष्टाला किंवा परिस्थिती ला वडिलांना जबाबदार धरताना, आपण कधी त्यांच्या बाल पणाच्या परिस्थिती चा विचार करतो का? आपण हा विचार करीत  नाही जरी आपण बाल पणी कष्ट भोगले असले तरी सुदैवाने आपल्या तरुणपणी तरी आपल्याला  चांगला काळ पाहायला मिळाला?पण वडिलांचे काय? त्याचा तर उमेदीचा काळच कष्टात गेला ना? बाल पण तर त्याहून वाईट  हालाखीतच...  

चित्रपटात तरी काय चित्र वेगळे? बहुतेक ठिकाणी वडील हे पात्र विनोद निर्मिती करण्या करिता वापरलेले,नाहीतर लाचार किंवा खलनायकी...असे किती चित्रपट आहेत ज्यात कर्तुत्ववान आणि प्रेमळ पिता दाखवलेला आहे. त्या उलट आई बद्दल - अमिताभ ची आई म्हंटले की लगेच निरुपा रॉय डोळ्या समोर...थोडी आधुनिक आई म्हणजे रीमा लागू?? कर्तुत्ववान आई म्हणजे नर्गिस "मदर इंडिया" 
असे किती अभिनेते वडील म्हणून डोळ्यासमोर येतात? वडिलांच्या संदर्भात लक्षात राहणारे चित्रपट म्हणजेज्यात वडील आणि मुलात विसंवाद..जसे कि - शक्तीबागबान किंवा दबंग.हिंदी चित्रपटात "मेरे पास मा है" हा संवाद जसा गाजला तसाच वडिलांच्या बाबतीत "मेरा बाप चोर है" हे दोनही संवाद एकाच चित्रपटातील..पण केवढा हा विरोधाभास...इथे वडिलांबद्दलचा हा संवाद त्यांची  लाचार परिस्थिती सांगण्या करिता वापरलेला खरेच का वडील एवढे लाचार असतात ? नक्कीच नाही...आणि कधी परिस्थिती मुळे झाले तरी ते केवळ कुटुंबा च्या भल्या करिता!!! पण दुर्दैवाने पुढील आयुष्यात कुटुंब बहुतेकदा हे सोयीस्कर पणे विसरते.. हा कदाचित एक त्या नात्याला शाप असावा!!!!
का यां चित्रपटसृष्टीला कर्तुत्ववान वडील दाखविता येऊ नयेत?  आठवून पहा - चंद्रकांत गोखले, ए के हंगल,  शरद तळवलकर अजूनही बरेच डोळ्या समोर येतात.... लहान पणी मुल आजारी पडले किंवा काही त्रास झाला तर बरेचदा आई रडून मोकळी होते , पण वडिलांना परिस्थिती संयमाने हाताळावी लागते ..खरे तर रडणाऱ्या पेक्षा समजावणाऱ्या वरच ताण जास्त पडतो..
पुढे मुलीच्या लग्नात तरी काय वेगळे घडते?
मुला मुलींच्या शिक्षणा करिता झटणे, शाळा, कॉलेजेस चे उंबरठे झिजवणे...वेग वेगळ्या क्लासेस ना मुलांना पाठविणे आणि त्यातच नोकरीची दोरीवराची कसरत करण्यात  आयुष्याची उमेदीची वर्षे संपतात, आणि तशात जमा खर्चाचा ताळ मेळ जोडता जोडता आयुष्याची संध्याकाळ होते, मुले पायावर उभी राहिली आणि आता ते आपली जबादारी घेतील या एका आशेवर आयुष्याच्या संध्याकाळ ला सामोरे  जायची तयारी करत असतात, पण या स्वप्नाचा सुखद शेवट प्रत्तेक वडिलांच्या नशिबी नसतो... पण आपले प्राक्तन म्हणून तशाही परिस्थितीला सामोरे जातात          
आपल्या समाजाने पण सतत वडील या नात्याची उपेक्षाच केली आहे...असे किती सण आहेत की जे वडिलान करिता आहेत? कोणी म्हणेल दिवाळी पाडवा...पण खरे तर तो सण त्यांच्या पेक्षा जास्त आई,लेकी आणि बायको करिता महत्वाचा....लग्नात विहिणीची पंगत असते...मान वर माई चा...वडिलांचे काय? 
एका वाचलेल्या कवितेची नकळत आठवण झाली, त्यात खरेच हि व्यथा किती थोडक्यात सांगितली आहे 
कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय,
बापमाणूस असतो तो, बापांशिवाय कसा कळणार?असतं न्यारंच रसायन, त्याची फोड उकलत नाही,म्हणून तर बापावर कविता कोणी करत नाही...”



या नात्याला हे जे सगळे शाप आहेत त्यांना उशा:प देण्याचा आपण सगळ्यांनी थोडा तरी प्रयत्न करावयास हवा..

"कौसल्ये चा  राम जरी म्हंटले गेले तरी, दशरथ राजा चा मृत्यू पुत्र वियोगाने झाला हे आपण विसरून चालणार नाही!!!”

बिपीन कुलकर्णी